महिला व कार्यकर्त्यांनी धरले रूपाली चाकणकर यांना धारेवर   

पिंपरी : वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना शुक्रवारी महिला आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले. तुम्ही दिवे लावले असते तर, ही वेळ आली नसती. पदाची गरिमा सांभाळा, असा सल्लाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.तुम्ही घटनात्मक पदावर काम करत आहात. मात्र, अजूनही तुमच्याकडे न्याय मागावा लागतो. हे दुर्दैव असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले.
 
यावेळी पत्रकारांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाकडे वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे आणि जाऊ मयुरी हगवणे या दोघींनी एकमेकांविरोधात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. एकाच दिवशी या दोघींनी एकमेकांविरोधात मेलद्वारे तक्रार दाखल केल्यानंतर दुसर्‍या दिवशी लागलीच बावधन पोलिस ठाण्यात यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण कौटुंबिक असल्याने याप्रकरणी समुपदेशनासाठी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना बोलावले होते, असेही त्या  म्हणाल्या.
 
महिला आयोगाने तात्काळ कारवाई केली असती, तर वैष्णवीचा जीव वाचला नसता का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, आयोगाकडे आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याचे काम महिला आयोगाचे असते. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात जे पुरावे सापडतील ते विधी सेवा प्राधिकरणाकडे देऊन त्यासंदर्भात न्यायालयाने निकाल देणे अपेक्षित असते. आयोगाने सांगितल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles